मुलांविषयी तुम्हाला खरी तळमळ असेल, तर उद्याच्या उद्या जगात क्रांती घडून येईल
कशाला इतकी पोरं पैदा करता तुम्ही, त्यांचं संगोपन कसं करावं याची अक्कल नसताना? ...मुलांविषयी तुम्हाला खरी तळमळ असेल ना, लोक हो, तर उद्याच्या उद्या जगात क्रांती घडून येईल. ...आपल्या मुलांवर जर तुमचं प्रेम असेल; तुमच्यामते जर ती ‘गोंडस खेळणी’ नसतील - दोन घटका मन रमवणारी व नंतर वैताग आणणारी खेळणी नसतील - तर मुलं काय खातात, कुठे निजतात, दिवसभर काय करतात; त्यांना मार पडतोय का, त्यांची मनं कुस्करली जाताहेत का, त्यांचं व्यक्तित्व ठेचून टाकलं जातंय का, हे जाणून घ्यावंसं नाही वाटणार तुम्हाला?? पण ते जाणून घ्यायचं म्हणजे चिकित्सा केली पाहिजे; मूल आपलं असो वा शेजाऱ्याचं असो, आपल्याठायी इतरांविषयी आस्था हवी, कणव हवी. तुमच्या मनात काडीची आस्था नसते - अपत्याविषयी, जोडीदाराविषयी, कुणाचविषयी काही वाटत नाही तुम्हाला. ...आपल्याला काही फिकीर नसते, म्हणूनच वेळही नसतो आपल्यापाशी या गोष्टींसाठी. पूजाअर्चा करण्यासाठी आपल्याकडे वेळ असतो; पैसे कमावणं, क्लबात जाणं, धांगडधिंगा, मौजमजा - साऱ्यासाठी वेळ असतो, पण मुलांबद्दल गांभीर्याने विचार करण्यासाठी, त्यांना वात्सल्य देण्यासाठी बिलकुल वेळ...