धर्म म्हणजे अध्यात्म नव्हे
समाजव्यवस्था आकारास येत गेल्या तसे एकामागून एक ढाचे निर्माण होत गेले - राजकीय ढाचे, आर्थिक ढाचे, शैक्षणिक ढाचे...अनेकानेक structures . यातून संस्कृती आकारास येत गेल्या. जीवनात आपण प्राप्तीची क्षेत्रं निर्माण केली व धर्मालाही प्राप्तीच्या क्षेत्रातच घालून मोकळे झालो. ज्याप्रमाणे आम्ही घर बांधतो, दुकानं थाटतो त्याप्रमाणे ही सृष्टी बनवणारादेखील कोणीतरी असला पाहिजे असं आम्हीच ठरवून टाकलं व साक्षात् ईश्वराला जन्माला घातलं! या ईश्वराचे गुणदेखील आम्ही निश्चित केले: तो नेहेमी न्याय करेल, अन्याय करणार नाही; तो प्रेम करेल, क्षमा करेल, पुण्याला इनाम देईल, पापाला शिक्षा देईल, मृत्यूपश्चात आम्हाला स्वर्ग-नरक देईल वगैरे सगळं आम्ही ठरवून टाकलं. ‘ईश्वर’ नावाचं एक अधिकारस्थान, एक authority निर्माण केली. बिचारा ईश्वर, त्याला नकार देण्याची सोय नव्हती, कारण त्या बापाचे बाप आम्ही होतो! स्वतःवर तर आमचा विश्वास नाहीच. ‘आमचे परस्परसंबंध, आमची नीतिमत्ता सगळं आमचं आम्ही पाहून घेऊ’ असं म्हणण्याची हिम्मत आमच्यात नाही. आम्हाला प्रत्येक ठिकाणी डोक्यावर बसणारी अधिकारी मंडळी पाहिजेत. बनावट...