कर्म हेच फळ
जोवर कर्म हाच आनंद बनत नाही; कर्माच्या बाहेर कुठूनतरी,
कसलंतरी सुख मिळणार आहे या भ्रमात जोवर तुम्ही रहाल, तोवर दुःखंच दुःखं तुमच्या वाट्याला येणार हे नक्की.
वास्तविक कर्मात, आत्म-अभिव्यक्तीत तुम्हाला तृप्ती का वाटू नये? समाधान का मिळू नये? 'मला
जगण्याची संधी मिळाली अन् मी जगलो; परिणामांची, फळाची तमा न बाळगता जगलो' -
असं असेल तर मनुष्याला कर्म करण्यात आनंद होईल. आनंदासाठी परिणामांची
प्रतिक्षा करावी लागत नाही, 'पुढं काय होतं पाहू' असं म्हणावं लागत नाही. आत्ता, इथे मी जे केलं, त्यातच मी तृप्त झालो, संतुष्ट झालो. ...कर्म करावं अन् तेवढ्यापुरतं मरून जावं! खरंच,
प्रत्यक्ष मरणघटका येण्याची वाट का पहावी माणसानं? एकेक कर्म करीत जावं,
तिथंच पूर्णतृप्ती साधावी, परिणामांना म्हणजे सुखदुःखांना तिलांजली द्यावी,
त्यांच्या स्मृती साठवत, उगाळत बसू नये.
जे व्हायचं होतं ते झालं, जेवढं करता येण्यासारखं होतं तेवढं केलं. विषय संपला.
सुख
झालं, दुःख झालं; हसू आलं किंवा रडू आलं म्हणून काय बिघडलं? काय हरकत आहे?
पण तुम्ही ती गोष्ट तिथेच संपू देत नाही, विरून जाऊ देत नाही. मनात धरून
ठेवता, त्याचा रवंथ करता, चघळत बसता. मग तुमच्या मनात गोष्टी कुजू, सडू
लागतात. त्यांच्या दुर्गंधीनं तुमचं तन-मन व आजूबाजूचं वातावरण दूषित होऊन
जातं.
सुखदुःखविचारभावनादी
प्रत्येक गोष्ट निसर्गतः लयास जाते, संपुष्टात येते - तिचा तसा अंत होऊ
द्या, तिला धरून ठेवू नका, साचवू नका. हे घडताच तुम्ही ताजेतवाने होता,
निर्भार होता. तुमच्या जगण्याला टवटवी येते.
- विमला ठकार

Comments
Post a Comment