धर्म म्हणजे अध्यात्म नव्हे
समाजव्यवस्था
आकारास येत गेल्या तसे एकामागून एक ढाचे निर्माण होत गेले - राजकीय ढाचे,
आर्थिक ढाचे, शैक्षणिक ढाचे...अनेकानेक structures. यातून संस्कृती आकारास
येत गेल्या. जीवनात आपण प्राप्तीची क्षेत्रं निर्माण केली व धर्मालाही
प्राप्तीच्या क्षेत्रातच घालून मोकळे झालो.
ज्याप्रमाणे आम्ही घर
बांधतो, दुकानं थाटतो त्याप्रमाणे ही सृष्टी बनवणारादेखील कोणीतरी असला
पाहिजे असं आम्हीच ठरवून टाकलं व साक्षात् ईश्वराला जन्माला घातलं! या
ईश्वराचे गुणदेखील आम्ही निश्चित केले: तो नेहेमी न्याय करेल, अन्याय
करणार नाही; तो प्रेम करेल, क्षमा करेल, पुण्याला इनाम देईल, पापाला शिक्षा
देईल, मृत्यूपश्चात आम्हाला स्वर्ग-नरक देईल वगैरे सगळं आम्ही ठरवून
टाकलं. ‘ईश्वर’ नावाचं एक अधिकारस्थान, एक authority निर्माण केली. बिचारा
ईश्वर, त्याला नकार देण्याची सोय नव्हती, कारण त्या बापाचे बाप
आम्ही होतो!
स्वतःवर तर आमचा विश्वास नाहीच. ‘आमचे परस्परसंबंध, आमची नीतिमत्ता सगळं आमचं आम्ही पाहून घेऊ’ असं म्हणण्याची हिम्मत आमच्यात नाही. आम्हाला प्रत्येक ठिकाणी डोक्यावर बसणारी अधिकारी मंडळी पाहिजेत. बनावट ईश्वराची का असेना, खोटी का असेना पण authority हवी!
स्वतःवर तर आमचा विश्वास नाहीच. ‘आमचे परस्परसंबंध, आमची नीतिमत्ता सगळं आमचं आम्ही पाहून घेऊ’ असं म्हणण्याची हिम्मत आमच्यात नाही. आम्हाला प्रत्येक ठिकाणी डोक्यावर बसणारी अधिकारी मंडळी पाहिजेत. बनावट ईश्वराची का असेना, खोटी का असेना पण authority हवी!
केवळ
ईश्वर बनवून आम्ही थांबलो नाही बरं का. त्याच्या कामकाजाची व्यवस्थादेखील लावली
आम्ही. जो कुणी ईश्वराज्ञा मानणार नाही त्याचं पारिपत्य करण्यासाठी आम्ही
सेना निर्माण केली, त्यांच्या हाती शस्त्रास्त्रं दिली. अपराध्यांना
डांबण्यासाठी कारागृहं उभी केली. हे सगळं नाटक, हा तमाशा तुम्ही नीट
पहाताय ना? नीट, उघड्या डोळ्यांनी हे पाहिलं, समजून घेतलं तरच आपण
त्यापलिकडे जाऊ शकू.
ईश्वर
बनवला नि त्याला रहायला घर नाही, असं कसं! घर तर हवंच. मंदीर हवं, मशीद हवी, चर्च हवं, गुरुद्वार हवं. मग त्याला नटवणं-थटवणं.
त्याच्या नवाखाली उत्सव, भजन-कीर्तन, भोजनाच्या पंगती, सणसमारंभ, धम्माल!
ही जी वास्तविकता आहे, ती एकदा नीट पहा. डोळे उघडा. भ्रमात राहू नका.
अध्यात्म
म्हणजे भ्रमनिरास. दृष्टी निभ्रांत असेल, चित्त निःसंदेह असेल तर अध्यात्म
आहे असं म्हणता येईल. नाहीतर नाही. नाना प्रकारच्य भ्रमांना पोसण्याचा,
गोंजारण्याचा जो धंदा मनुष्यजातीनं केला आहे त्याला रामराम ठोकण्याची,
त्यातून उत्तीर्ण होण्याची वेळ आता आलेली आहे. झालं ते फार झालं.
पुरे आता!
ईश्वरप्राप्तीचे साधनामार्ग तयार झाले. मंत्र, तंत्र, यंत्रं, कर्मकांडं, संप्रदायांच्या चौकटी बनल्या, ढाचे बनले.
हे ढाचे, structures का निर्माण होतात? - ढाच्यांमधे सुरक्षितता वाटते. ईश्वर नामक ढाच्यात व्यक्तिगत सुरक्षा असते तशी धर्मांसारख्या ढाच्यांत सामूहिक सुरक्षा असते. लौकिक म्हणवणऱ्या जीवनात आग्रह, आक्रमण, तुलना, ईर्ष्या, स्पर्धा आदींचा बाजार असतो, तसा धार्मिक म्हणवणाऱ्या क्षेत्रातही चाललेला असतो.
हे ढाचे, structures का निर्माण होतात? - ढाच्यांमधे सुरक्षितता वाटते. ईश्वर नामक ढाच्यात व्यक्तिगत सुरक्षा असते तशी धर्मांसारख्या ढाच्यांत सामूहिक सुरक्षा असते. लौकिक म्हणवणऱ्या जीवनात आग्रह, आक्रमण, तुलना, ईर्ष्या, स्पर्धा आदींचा बाजार असतो, तसा धार्मिक म्हणवणाऱ्या क्षेत्रातही चाललेला असतो.
सर्वपल्ली
राधाकृष्णन यांची मला इथे आठवण होते. या देशातील फार मोठे तत्त्वचिंतक
म्हणून ते ओळखले जातात. मी M.A.ला तत्त्वज्ञान हा विषय घेतला होता. भारतीय
तत्त्वज्ञानाचा अभ्यास करता करता काहीकाळ राधकृष्णन यांच्या घरी मी राहिले.
त्यावेळी जे Philosophy Association of India स्थापिलं गेलं त्याचे
ते अध्यक्ष होते व मी सचिव. वर्षानुवर्षं त्यांच्यासोबत काम केलं
मी. किती आदर मला त्यांच्याबद्दल! पुढे ते राष्ट्रपती
बनले तेव्हा मी विनोबा भावेजींच्या भूदान आंदोलनात काम करत होते. विनोबा
मला पुष्कळदा म्हणत, 'जा, त्यांना भेटायचं असेल तर भेटून ये.'
एकदा
राष्ट्रपती भवनात जाण्याचा योग आला. राधाकृष्णन लोकांच्या घोळक्यात बसलेले. कसलीतरी चर्चा सुरू होती. मला पाहताच ते म्हणाले, 'बैस इथं. आपण नंतर
बोलू.'
राधाकृष्णन यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपतीपद मिळण्याची
चिह्नं दिसत नव्हती, याबाबत काय करता येईल अशी ती चर्चा चालली होती! राधाकृष्णन कित्ती दुर्मुखलेले होते म्हणून सांगू! मी तर त्यांचे मोठमोठे ग्रंथ वाचूनच तत्त्वज्ञान
शिकले होते. आमच्या लेखी राधाकृष्णन म्हणजे साधुपुरुष. काय ते व्यक्तित्व!
काय ते अमोघ वक्तृत्व! तो खाणंपिणं, रहाणीमानातला साधेपणा! पण
आज त्यांच्या चित्तात केवढा हा मत्सर, केवढी सत्तापिपासा होती!
त्यांची ती भाषा, आवाजातील तो क्रोध, छे! मी थरथर कापत तिथं बसले होते, अगदी मुळापासून हादरले होते.
अरे! ज्यांनी एवढे प्रचंड ग्रंथ लिहिले, इतकं शिकवलं त्यांची ही स्थिती? मी
मनोमन आश्चर्य करू लागले. त्यांचा ज्ञानसंग्रह म्हणजे केवळ
शब्दप्राप्ती होती तर. त्यांच्या जीवनात क्रांती मुळीच घडलेली नव्हती.
जीवनात अध्यात्म नव्हतं.
माझ्या
लक्षात आलं, की अशा लोकांच्या दृष्टीने तत्त्वज्ञान हासुद्धा एक प्राप्तीचाच विषय
असतो. प्राप्ती, संग्रह. आणि संग्रहाचा उपयोग कशासाठी करतात ते?
- प्रदर्शनासाठी! आपलं घर कसं सजवलंय याचं कसं प्रदर्शन तुम्ही मांडता?
आपल्या उंची वस्त्रांचं, दागदागिन्यांचं नटून-थटून प्रदर्शन मांडता, तसंच
हेही करतात - आपल्या ज्ञानाचं, सिद्धींचं, शक्तींचं प्रदर्शन मांडतात, अवडंबर माजवतात!
कशामुळे
झालं हे? - जीवन हे केवळ प्राप्तीचं क्षेत्र असं मानून बसल्यामुळे.
'धर्मक्षेत्र हेसुद्धा कुरुक्षेत्र आहे' असं समजल्यामुळे. जीवनाला रणभूमी
मानून प्राप्तीसाठी लढाया, झटापटी करणं - मग त्या भौतिक साधनसामग्रीसाठी
असोत, ज्ञानासाठी असोत वा अंतिंद्रिय शक्तींसाठी असोत - आयुष्य म्हणजे
झटापटी, ओरबाडा-ओरबाडी होऊन गेलीय. लुबाडणं, मुंड्या मुरगाळणं! हे दुःख
आहे आजच्या समाजाचं. याची पाळंमुळं नीट, लक्षपूर्वक बघा.
जीवनात
प्राप्तीचं म्हणून काही क्षेत्र आहे - आहे ना. स्वतःचं भरणपोषण करणं. पण
नुसतं उदरभरण म्हणजेच जीवन आहे का? नुसतंच ज्ञानार्जन, नोकरीधंदा करणं,
चरितार्थ चालवणं म्हणजेच जगणं का? अध्यात्म
सांगतं, की जीवन हे 'बोधाचं क्षेत्र' आहे. जीवनाची जी
वास्तविकता आहे, यथार्थता आहे, ती समजून घेण्याचं क्षेत्र.
अध्यात्म
हे प्राप्तीचं क्षेत्र नाही. मग कसलं क्षेत्र आहे? - संस्कृतात एक
सुंदर शब्द आहे: उपलब्धि ! जे आपल्यापाशी आहेच त्याचं भान येणं, त्याबाबत
जागृत होणं म्हणजे उपलब्धि.
तेव्हा,
अध्यात्मात काय केलं जातं? जे आधीपासूनच आहे तिकडे तुमचं लक्ष वेधलं जातं.
ज्याचं भान तुम्हाला उरलेलं नाही त्याचं भान दिलं जातं. शब्दांत
सांगणं शक्य असेल तिथवर त्यांचा उपयोग करून तुमचं आत्मभान जागं करणं
म्हणजे अध्यात्म.
स्वतःला विचारा: मला खरा आनंद कशात आहे? समजून घेण्यात आहे, की लोकांपुढे
प्रदर्शन मांडण्यात आहे? मला प्राप्तीची खुमखुमी आहे का, लोकांपुढे शेखी
मिरवायची आहे का? तसं असेल तोवर परिवर्तन संभवतच नाही.
परिवर्तन प्राप्तीने होत नाही, बोधाने होतं.
- विमला ठकार

Comments
Post a Comment