जग सत्कारणी लावायचं असेल; जगाची व जगात व्यतीत होणाऱ्या आपल्या काळाची उधळमाख थांबवायची असेल तर 'या जगात असावं कसं' हे आपण पुन्हा नव्याने शिकून घ्यायला हवं. जगण्याचं कसब; आपण इथलेच, या विश्वाचेच असल्याचं भान; विश्वाचा एक अंश असण्यातला अत्यानंद या साऱ्यात नित्य जाणीव अंतर्भूत असते - पशुमात्रांशी एक पशू म्हणून, भूतजीवांशी एक जीव म्हणून, पदार्थवस्तूंशी एक पदार्थवस्तू म्हणून आपलं जे सख्य असतं, नातं असतं त्याची जाणीव. झाडं, नद्या, टेकड्यांना सहचरांच्या, आप्तेष्टांच्या गोतावळ्यात सामावून घेऊ शकलो तर कदाचित आपण त्यांच्याकडे निव्वळ 'नैसर्गिक संसाधनं' म्हणून पाहणार नाही. मला वाटतं मी अखिल सृष्टीला विषयरूप देण्याचा, तिला आपलं म्हणण्याचा प्रयत्न करतेय, कारण तिला स्वतःवेगळं काढल्याने, तिचं ठोस वस्तूकरण केल्याने आपण कुठे येऊन पडलोत पहा ना! ताब्यात घेणं, पादाक्रांत करणं, पिळवणूक इतकाच फक्त 'आपलं म्हणण्या'चा अर्थ नव्हे. ही आपणवणूक मन व कल्पनाशक्तीपल्याड मोठी झेप घेण्याशी निगडित असू शकते. ...विज्ञान बाह्यात्काराचं अचूक वर्णन करतं. कविता अभ्यंतराचं स्पष्टवर्णन करते. विज्ञान विवेच...